कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्गाला लागून वाहणाऱ्या दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीचे पाणी काठालगत असलेल्या शेतात पसरले आहे.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने तेथून पाणी मोठ्या प्रमाणावर दूधगंगा नदीला येत आहे.
त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने काठा लगत असलेल्या शेतातील पाण्याच्या मोटारी सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी शेतकऱ्यांची मात्र तारांबळ उडाली.नदीचे पाणी शेतात पसरल्याने ऊस आणि अन्य पिकांचे नुकसान झाले आहे.
नदीच्या पाण्याच्या पातळीत दररोज वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी खबरदारी बाळगावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून देखील काही तरुण नदीत पोहण्याचे धाडस करत आहेत.शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि भुईमूग पेरणी पूर्ण केली आहे.